आक्रमणा नच साहिल भारत...

15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले पण भारतमाता खंडित झाली. काश्मीर संस्थानचे महाराजा हरिसिंग हे काही केल्या काश्मीर भारतात विलीन करण्यास तयार होईनात. याच दरम्यान पाकिस्तानने मुस्लिम टोळीवाल्यांच्या माध्यमातून काश्मीरवर आक्रमण केले. शेख अब्दुल्लांचा कैवार घेऊन पं. नेहरू काश्मीरमध्ये सैन्य पाठविण्यास तयार होत नव्हते. महाराजा हरिसिंग स्वत: तर दुर्बळ होतेच, त्यातच त्यांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिक त्या टोळीवाल्यांना जाऊन मिळाले. 20 ऑक्टोबर 1947 रोजीच श्रीनगरात पाकिस्तानी ध्वज फडकावून आनंदोत्सव साजरा करण्याची आक्रमकांची योजना होती. त्यावेळी विलीनीकरण विभाग केंद्रीय गृहमंत्री सरदार पटेलांकडे होता. अशा पेचात असताना पटेलांनी श्रीगुरुजींना दिल्लीला पाचारण केले. 'नेहरूंच्या अटी मान्य करवून काश्मीर भारतात विलीन करण्यास महाराजा हरिसिंगांचे मन अनुकूल करणे' ही श्रीगुरुजींवर जबाबदारी होती. काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान मेहेरचंद महाजन यांच्याकडून श्रीगुरुजींना भेटीचे निमंत्रण येईल अशी व्यवस्था सरदार पटेलांनी केली. काश्मीर भारतातच राहावा अशीच श्रीगुरुजींचीही इच्छा होती. हरिसिंग व श्रीगुरुजींची भेट 17 ऑक्टोबर 1947 रोजी झाली. प. पू. श्रीगुरुजींनी समजावून सांगितले, ''आपण हिंदू राजे आहात. पाकिस्तानात विलीनीकरण केल्यास आपले व आपल्या प्रजेचे जीवित धोक्यात येईल. आज भारतातून ये जा करण्याचे रस्ते, रेल्वे व विमान वाहतुकीची व्यवस्था नाही हे खरे आहे. परंतु ती सोय फारच लवकर करता येईल. भारतात विलीन होण्यातच आपले व आपल्या संस्थानाचे कल्याण आहे.'' श्रीगुरुजींनी आपली शिष्टाई यशस्वी केली. महाराज हरिसिंग विलीनीकरणास तयार झाले. 26 ऑक्टोबरला तशा सह्याही झाल्या. चर्चेदरम्यान हरिसिंग म्हणाले, ''संघाच्या स्वयंसेवकांनी आम्हाला वेळोवेळी अत्यंत महत्त्वाच्या वार्ता पुरविल्या आहेत. अशा वार्ता मिळविताना संघाच्या स्वयंसेवकांनी जे साहस दाखविले, त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.''
पण संघाचे काम एवढयात संपायचे नव्हते! 27 ऑक्टोबरपासून भारतीय सेना श्रीनगरच्या विमानतळावर उतरू लागली. पण हे काम वाटले तितके सोपे नव्हते, कारण विमानतळावर बर्फाचा दाट थर साठला होता. नेहरूंचे संघाविषयी प्रतिकूल मत माहीत असूनही मेजर मल्होत्रा संघाच्या कार्यालयात गेले. तेथे प्रेमनाथ डोग्रा यांना भेटले. संघाचे 600 स्वयंसेवक कामाला लागले. मग काय? विमानतळ पाऊण तासात साफ झाला. भारतीय सेना वेळेत उतरली. दिल्लीतील सेनाधिकारी विवंचनेत पडले होते. त्यांनी आश्चर्यचकित होऊन मेजर मल्होत्रा यांना दूरभाषवर विचारले, ''इतक्या थोडया वेळात इतके मजूर कुठून मिळविलेत?'' मेजर मल्होत्रांनी सांगितले, ''काम मजुरांनी केले नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी केले!'' एवढयावरच ही बहादुरी संपली का? नाही! दारूगोळयाच्या 20 पेटया भारतीय वैमानिकांनी टाकल्या होत्या. त्या शत्रूच्या गोळीबाराच्या टप्प्यात होत्या. संघाचे स्वयंसेवक सरपटत गेले. त्यांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही, पण दारूगोळयाच्या पेटया आणल्या. श्रीनगर येथील एका जबाबदार कार्यकर्त्याच्या निवेदनानुसार संघाच्या 200 स्वयंसेवकांनी शस्त्रे चालविण्याचे झटपट शिक्षणही घेतले. त्यांनी सरकारकडून काही शस्त्रेही मिळविली व विमानतळाचे संरक्षण केले. भारतीय सैनिक उतरल्यावरच त्यांनी आपापल्या जागा सोडल्या. या सगळया धडपडीत संघाच्या काही स्वयंसेवकांना हौतात्म्यही पत्करावे लागले. स्वयंसेवकांनी हे कार्य केले नसते तर, कदाचित काश्मीर हातचे गेलेही असते.
इकडे भारतीय सेना पराक्रमाची शर्थ करत असतानाच, तिकडे श्रीगुरुजींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काश्मीरचा प्रश्न युनोत नेण्याचे नेहरूंच्या मनात घाटत होते. ''युनो (संयुक्त राष्ट्रसंघ) हा मोजक्याच शक्तिसंपन्न राष्ट्रांच्या डावपेचांचा आखाडा बनला आहे व भारताला तेथे न्याय मिळणार नाही'', असा इशारा श्रीगुरुजींनी दिला होता. परंतु पं. नेहरू घाईने संयुक्त राष्ट्रसंघात गेले आणि फसले. काश्मीर प्रश्न दिवसेंदिवस उग्रच बनत गेला. आज आपण सगळेच त्याची कटू फळे चाखत आहोत.

आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ चला ।
'आक्रमणा नच साहिल भारत' गर्जुनि सांगू जगताला ॥ धृ ॥
उन्नत शिखरे हिमालयाची, पवित्र श्रध्दास्थाने अमुची, प्राणपणाने रक्षायाची
हीच प्रतिज्ञा आता अमुची, देईल आम्हा विजयाला ॥ 1 ॥
दे जगदंबे तलवारीला, देई शंकरा पाशुपताला, योगेश्वर द्या सुदर्शनाला,
या अस्त्रांनी दानव मर्दुनि, अखंड रक्षू सीमेला ॥ 2 ॥
स्वातंत्र्याचे करण्या रक्षण, सामर्थ्याचे करू संवर्धन,
हासत करूनी प्राण समर्पण
उंच उभवुया भूमितलावर भारत-भू-अभिमानाला ॥ 3 ॥
कोटि कोटि मनगटे उभारून, आक्रमणा या काढू ठेचून,
कोटि कोटि कंठातून गर्जुन
विजयश्रीने मंडित करूया सदैव भारत जननीला ॥ 4 ॥
... गर्जुनि सांगू जगताला