वेद मंत्राहून आम्हा, वंद्य वंदे मातरम

23 ऑगस्ट 1950 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर श्रीगुरुजींचा नागरिकांच्या वतीने सत्कार होता. मुख्य कार्यक्रम अभिनंदन पत्र समर्पणाचा होता. व्यासपीठावरून विविध वक्त्यांची भाषणे चालली होती. त्याच वेळी श्रीगुरुजी कागदाच्या एका तुकडयावर झरझर काहीतरी लिहीत होते. बघणा¬याला जणू असेच वाटावे की, श्रीगुरुजी आपल्या अभिनंदनाला उत्तर देण्यासाठी काही तरी मुद्दे लिहीत आहेत. वास्तविक ज्यांना श्रीगुरुजी म्हणजे काय आहेत, याची माहिती होती, त्यांना अशी शंका यायचे काहीही कारणच नव्हते. श्रीगुरुजींच्या संगणकसदृश मेंदूला कागदाच्या चिठो¬यावर मुद्दे काढून बोलण्याची कधी वेळ आलीच नव्हती! सरस्वती सदैव त्यांच्या जिभेवरच विराजमान असे. मग जर ते मुद्दे लिहीत नव्हते तर काय लिहीत होते? इकडे व्यासपीठावर एक वेगळीच घटना घडत होती. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण 'वंदे मातरम्' गायले जाणार होते. श्रीगुरुजींनी गाणा¬याला जवळ बोलावून घेतले आणि विचारले, ''तुला संपूर्ण 'वंदे मातरम्' गाता येते का?''

गायक उत्तरला, ''नाही.''

''का?'' श्रीगुरुजींनी विचारले.

''मला संपूर्ण 'वंदे मातरम्' पाठ आहे, असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.'' तो उत्तरला.

''संपूर्ण गीत लिहून दिले तर, गाऊ शकशील का?'' श्रीगुरुजींनी विचारले.

''हो निश्चितच.'' तो आत्मविश्वासपूर्वक उत्तरला.

श्रीगुरुजींनी ताबडतोब एक कागदावर संपूर्ण 'वंदे मातरम्' लिहायला प्रारंभ केला. बसल्या बसल्या श्रीगुरुजींनी संपूर्ण 'वंदे मातरम्' लिहून काढले. तो कागद त्या स्वयंसेवकाकडे दिला आणि श्रीगुरुजी निर्धास्त झाले!

इकडे सत्कार समारंभ झाल्यावर त्या स्वयंसेवकाने अतिशय सुंदरपणे संपूर्ण वंदे मातरम् म्हटले. वास्तविक त्या सभेत श्रीगुरुजींचीच स्तुती गायली जात होती. परंतु श्रीगुरुजी मात्र मातृभूमीच्या स्तुतीच्या गीतात कोणतीही उणीव राहू नये म्हणून दक्ष होते!

वेद मंत्राहून आम्हा, वंद्य वंदे मातरम् ॥ धृ ॥
याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे, शस्त्र 'वंदे मातरम्' ॥ 2 ॥