रीत साधी शिस्त बांधी

कृष्ण माधव घटाटे एकदा श्रीगुरुजींना मोटारीतून घेऊन नागपूरच्या धंतोली भागातून जात होते. श्रीगुरुजी चालकाच्या शेजारच्याच आसनावर बसले होते. कृष्णराव मोहरीर वगैरे मंडळी बरोबर होती. पटवर्धन मैदानाजवळचा छोटया धंतोलीचा चौक आला. तो फारच लहान होता. चौकात पोलीस नव्हता. कृष्णाने चुकीच्या बाजूने गाडी वळविली. श्रीगुरुजी एकदम रागावले. पुन्हा मोटार वळवून योग्य त्या बाजूने घ्यायला लावली व म्हणाले, ''कायदा न पाळणे हे भेकडपणाचे लक्षण आहे. आणि पोलिसाला भिऊन कायद्याचे नियम पाळणे हाही भित्रेपणाच. पोलीस नसताना कायदा मोडणारा काही शूर नव्हे. आपल्याला कोणी पाहणारा असो अगर नसो, आपण व्यक्तिगत किंवा सामाजिक नियम पाळलेच पाहिजेत. मग आपल्याला कितीही कष्ट होवोत. त्या कष्ट सोसण्यातच खरा शूरपणा आहे.''

1966 मधील घटना आहे. श्रीगुरुजी संध्याकाळच्या गाडीने बेळगावला जाणार होते. फलाटावर खूप गर्दी होती. प्रवेशद्वारातून आत जाताना खूपसे ओझे डोक्यावर लादलेला हमाल समोरून येताना दिसला. श्रीगुरुजींनी समोरच्या गर्दीला बाजूला करून त्या हमालाला वाट करून दिली. नंतर संस्कृतमधील एक श्लोक उध्दृत करून ते स्वयंसेवकांना म्हणाले, ''आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की डोक्यावरून ओझे वाहून नेण्यास आधी समोरची वाट मोकळी करून दिली पाहिजे.''
चक्रिणोमी दशस्थस्य रोगिणो भारिण: स्त्रिय:।
स्नातकस्य च राज्ञश्च पन्था देयो वरस्य च॥

(चक्रयुक्त रथावर आरूढ असलेला, 90 वर्षांहून अधिक वय असलेला, रोगी, ओझे वाहणारा, स्त्रिया, स्नातक आणि राजा यापैकी जर कुणी समोरून येताना दिसले तर, त्यांच्यासाठी आधी वाट मोकळी करून दिली पाहिजे.)

मंत्र छोटा, तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते
रीत साधी, शिस्त बांधी, कार्य व्यापक उभवीते ॥ धृ ॥