भक्ती सक्रिय हवी

श्रीगुरूजींचा असा आग्रह होता की, आपली या मातृभूमीवरील भक्ती सक्रीय असली पाहिजे. या सक्रियतेची त्यांची कल्पना अशी : ''मातृभूमीच्या कणाकणाचे स्वातंत्र्य व सन्मान यांच्या रक्षणासाठी सर्वस्वार्पण करण्याच्या मानसिक सिध्दतेचा राष्ट्रजीवनामध्ये होणारा प्रत्यक्ष अविष्कार ही या भक्तीची सक्रिय बाजु आहे. अशा भक्तिभावनेने भारलेले अंत:करण मग आपल्या या भूमीचा कोणताही अपमान सहन करणार नाही. ही भक्ती मग एवढे उग्र रूप धारण करते की, अशा प्रकारे आक्षेप घेणाऱ्या व्यक्तींना पुन्हा तसे करण्याचा अवसर राहु नये म्हणुन त्यांचा समूळ उच्छेद करीपर्यंत ती स्वस्थ बसत नाही. अशा भक्तीने भारलेले मन भूतकाळातील सर्व अपमान धुवून काढण्यासाठी सात्त्विक संतापाने धगधगत असते. क्रियाशीलता, गतिमानता व शौर्य या गुणांनीच जगावर प्रभुत्व मिळविता येते. 'वीरभोग्य वसुंधरा' हेच शेवटी खरे. जगातील यशस्वी जीवनाचे सारे रहस्य या दोन शब्दांत सामावलेले आहे''.
श्रीगुरूजींचा हिंदू राष्ट्रविचार असा विलक्षण तेजस्वी आणि प्रखर होता.
या विचारासंबंधी श्रीगुरूजींनी आणखी काय म्हटले आहे हे पाहण्यापूर्वी राष्ट्रसंकल्पनेचे त्यांना अभिप्रेत असलेले स्वरूप व हे हिंदू राष्ट्र असल्याचा तडजोडीपलीकडील आग्रह का धरावयाचा यासंबंधी श्रीगुरूजींनी वेळोवेळी जे विचार व्यक्त केले, त्यांचा थोडा मागोवा घेतला पाहिजे.