पुत्ररूप समाज

हिंदू समाज हा प्राचीन काळापासूनच भारताचा पुत्ररूप समाज म्हणून येथे नांदत आला आहे. या समाजाने येथे सर्वांगानी विकास करून घेतलेला आहे. 'माता भूमि: पुत्रोऽहम् पृथिव्य:' ही भावना आपल्या वैदिक पूर्वजांनी व्यक्त केली. या भूमीसंबंधी भक्तीची, चैतन्यमयतेची व असीम पावित्र्याची भावना जोपासली. सर्व प्रकारे वैभवशाली जीवन येथे उभे केले. आसेतुहिमाचल भारतमातेच्या पुत्रांना समान जीवनादर्शांनी सुसंस्कारित केले. विविधतेतील एकात्मतेचा शोध घेतला व एक श्रेष्ठ सांस्कृतिक प्रवाह येथे प्रवाहित केला. आजही त्याच धारेत आपला हिंदू समाज आहे. अर्थात तोच येथील राष्ट्रीय समाज आहे व त्याचे हे हिंदू राष्ट्र आहे.
भारतीय पूर्वसूरींनी येथील संपूर्ण जीवन व्यवहाराला जे आध्यात्मिक अधिष्ठान दिले, ते श्रीगुरूजींना मूलभूत महत्त्वाचे वाटत असे. हिंदू जीवनाचे हे व्यवच्छेदक वैशिष्ट जगातील अन्य कोणत्याही विचारप्रणालीत आढळत नाही. भांडवलवाद, साम्यवाद, समाजवाद आदी सारे जडवादी आहेत व संघर्ष आणि ईष्या, द्वेष, असहिष्णुता, शोषण आदी विकारांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून विमुक्त अशी समाजधारणा निर्माण करण्यास त्या असमर्थ ठरल्या आहेत, असे त्यांचे निरीक्षण होते. त्यांच्याच प्रचीतीच्या शब्द हे राष्ट्रीय वैशिष्टय पाहूया -