'जनता जनार्दन'

'जनता ही जनार्दनाचेच स्वरूप आहे, ही श्रेष्ठतम दृष्टी हा आपल्या राष्ट्रकल्पनेचा गाभा आहे. आपल्या विचारमालिकेत सर्वत्र हीच दृष्टी भरलेली आहे. आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक ठेव्यामध्ये आढळणाऱ्या अनुपम कल्पनांचा उदयही यातूनच झालेला आहे. यातूनच पुढे अशी दृष्टी व प्रेरणा उदित होते की, समाजातील प्रत्येक व्यक्ती ही त्या पूर्ण दिव्यत्वाचाच अंश आहे. समाजातील सर्व व्यक्ती सारख्याच पवित्र आहेत, सेवा करण्यास योग्य आहेत. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे हे निंद्य आहे. अशा प्रकारे समाजसेवेच्या भावनेला ईश्वरसेवेचे परमउदात्त रूप आपल्या राष्ट्रीय संस्कृतीने दिले आहे. श्री. रामकृष्ण परमहंसांनी समाजातील सेव्य अशा दलितपीडित लोकांना दरिद्रनारायण म्हटलेले आहे.'
''व्यक्तींच्या अपूर्णतेमूळे समाजात वरवर दिसून येणारी विविधता ही वस्तुत: समाजरूपी एक महान परिपूर्ण व शक्तिमान अशा सत्याचेच विविध आविष्कार होय. व्यक्तिमात्रामध्ये असलेल्या या दिव्य आत्मस्फुल्लिंगाची जाणीव आपल्या राष्ट्रजीवनाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक आदी विविध अंगांमध्ये व क्षेत्रांमध्ये खोलवर रूजलेली आहे. या सर्व अंगांची मिळून परस्पर सद्भाव व आदर यावर अधिष्ठित असलेले एक सुसंगत, सुसंवादी चित्र उभे राहते, अशी जी त्याची जडणघडण झाली आहे, ती या जाणिवेमुळेच. आत्मतत्त्वाचे हे सर्वव्यापकत्व ही आपल्या संस्कृतीने साऱ्या जगातील विचारविश्वाला दिलेली अद्वितीय अशी देणगी आहे.''
1972 साली ठाण्याला श्रीगुरूजींनी देशभरातील संघकार्यकर्त्यांच्या बैठकीत हाच महत्त्वाचा राष्ट्रीय वैचारिक वारसा प्रदान केला. आपल्या हृदयीचे हेच गुज सांगितले. याच सिध्दांताच्या आधारावर राष्ट्रजीवनातील विविध अंगोपंगांची युगानुकूल रचना कशी करता येईल, याचा विचार करून प्रयोगशीलता अंगीकारण्यास सांगितले.