भावात्मक मांडणी

हिंदू राष्ट्रविचाराची श्रीगुरूजींची मांडणी मोठी तर्कशुध्द आणि भावात्मक असे. प्रतिक्रियात्मक अजिबात नसे. मुसलमानांनी अमुक केले किंवा इसायांनी तमुक केले, म्हणून हा हिंदूंचा देश असे सांगण्यावर त्यांचा कधीही भर नव्हता. भारतभूमीत हिंदू समाजाचे जे एकात्म जीवन साऱ्या विविधतेला सामावून घेऊन सिध्द झाले, त्याचे निरनिराळे पैलू निदर्शनास आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
या दृष्टीने हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करतांना अर्थातच पहिला विचार पुढे यावयाचा तो भूमीचा म्हणजे आपल्या मातृभूमीचा. राष्ट्र उभे व्हावयाचे म्हणजे त्या राष्ट्राचे श्रध्दाकेंद्र असलेली भूमी असावयास हवी. परागंदा झालेल्या आणि जगभर विखुरलेल्या यहुद्यांना सुमारे 1800 वर्षांनंतर त्यांची भूमी मिळाली आणि तिथे आजचे इस्त्रायल राष्ट्र दिमाखाने उभे झाले. तोवर यहुद्यांना मातृभूमीचे मनोमन स्मरण ठेवावे लागले, प्रतीक्षा करावी लागली. आपले हिंदू राष्ट्र भौतिक आणि आध्यात्मिक संपदेसह जिथे विकसित झाले ती आपली हिंदूभूमी तर अतिप्राचीन आहे. 'आपली मातृभूमी', तिची थोरवी, तिचे पावित्र्य व मातृभूमीविषयी समस्त हिंदूंच्या उदात्त भावना हा श्रीगुरूजींच्या कितीतरी भाषणांचा विषय ठरलेला आहे.